दिवस 11 एप्रिल 2011...नॅशनल बास्केटबॉल चॉम्पियन अरुणिमा सिन्हा लखनौहुन दिल्लीला जायला निघाली होती, रिझर्वेशन न मिळाल्याने जनरल डब्यामध्ये चढावं लागलं.
रात्रीच्या वेळी सहा सात गुंडाच्या एका टोळीने तिच्या गळ्यात सोन्याची चेन बघितली, तिला टारगेट केले आणि दमदाटी करुन चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला.
नेहमीप्रमाणे, ट्रेन नपुंसक लोकांनी खचाखच भरलेली होती, कोणीही अरुणिमाच्या मदतीला आला नाही. अरुणिमाने चेन देण्यास नकार दिला, एका योद्ध्याप्रमाणे सर्वांशी लढत होती. चवताळुन त्यांचा विरोध करत होती.
एक एकवीस वर्षांची मुलगी आपल्याला भारी पडतेय, हे सहन न होवुन त्या गुंडानी तिला चालत्या ट्रेन मधुन फेकुन दिलं.
तेवढ्यात दुसरी ट्रेन आली आणि अरुणिमाचं डोकं दुसर्या ट्रेनवर आदळंलं, पाय ट्रेन खाली आले.
आपल्याला वाचुन अंगावर काट येतो, त्या मुलीने सहन कसं केलं, तिलाच ठावुक?
रात्र भर बरेली स्टेशनपासुन काही किलोमीटर अंतरावर, एका निर्जन स्थळी, जीवाच्या आकांताने, मदतीसाठी, ती जोरजोरात ओरडत राहीली.
रक्ताळलेल्या पायाच्या मांसाची मेजवानी खाण्यासाठी उंदीर मात्र आले, त्यांनी अरुणिमाचे पाय मांडीपर्यंत कुरतडले.
रात्रीतुन पन्नासहुन अधिक ट्रेन आल्या आणि तिला तुडवुन गेल्या. ती सांगते, मला फक्त व्हायब्रेशन्स जाणवायची, कारण शरीरातल्या संवेदना संपल्या होत्या, आणि डोळ्यांना दिसणंही बंद झालं,
आश्चर्यकारक रीत्या ती जिवंत राहीली, सकाळी काही लोकांनी तिला पाहीलं आणि बरेलीच्या डिस्ट्रीक्ट हॉस्पीटलमध्ये एडमिट केलं.
ग्रेट उत्तरप्रदेशातील हॉस्पीटलं ती, तिथं रक्तसाठा नव्हता, भुल द्यायची औषधंही नव्हती. तिने डॉक्टरांना बोलताना ऐकलं, तात्काळ पाय कापावा लागेल, हीला आताच्या आता दुसरीकडे हलवा, आपल्याकडे भुल देण्यासाठी ऍनेस्थेशिया नाहीये.
ती तशा अवस्थेत म्हणाली, “डॉक्टर, तुम्ही भुल न देता पाय कापुन टाका, होवुन होवुन अजुन किती त्रास होईल?”
तिची अवस्था आणि हिंमत पाहुन सगळे अवाक झाले, हळहळले, थक्क झाले.
त्यांच्यातली माणुसकी जागी झाली आणि डॉक्टर, कंपाऊंडर आणि फार्मासीस्ट ह्यांनी स्वतः तिला तीन युनिट रक्त दिलं.
पुढे ती एम्सला महिनाभर एडमिट होती.
एक पाय कायमचा गेला, प्रोथेस्टिक लेग लावला, दुसर्या पायात रॉड घातला गेला, पाठीच्या कण्याला तीन फ्रॅक्चर झालेले.
ती पडल्या पडल्या एकच प्रश्न विचारायची, “देवा, तु मला जिवंत का ठेवलसं?”….
आणि एके दिवशी, अचानक एक बातमी तिने वाचली, “अरुणिमा आणि सहप्रवाशात भांडण झाले होते, आणि झटापटीत ती खाली पडली.”
पोलीस आपलं अपयश झाकत होते, थोड्या दिवसांनी अजुन एक ब्रेकिंग न्युज आली, “अरुणिमा सिन्हा ने चालत्या ट्रेनमधुन आत्महत्येचा प्रयत्न केला.”
चवचाल मेडीया आपली औकात दाखवत होता. प्रशासन झालेल्या घटनेचा दोष अरुणिमाला देऊन मोकळं झालं होतं!
अरुणिमा सिन्हाने, तिच्या परीवाराने अनेक स्पष्टीकरणे दिली, कोणीही तिची दखल घेतली नाही.
तुटलेल्या पायांपेक्षा हे आरोप तिला जास्त जिव्हारी लागले.
अरुणिमाच्या हृदयात काहुर माजलं, ती मनात म्हणाली, “आज तुमचा दिवस आहे, एक दिवस मी जगापुढे स्वतःला सिद्ध करेन, एक खरा खेळाडु आत्महत्या करत नसतो.”
तिने आपल्या घरच्यांशी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा मानस बोलुन दाखवला, सर्वांनी तिला वेड्यात काढलं!
ती जिद्दी होती, हॉस्पीटलमधुन बाहेर पडून, पहीली महिला बछेंद्रीपाल यांच्याकडे गेली. तिला बघुन, आणि तिच्या हिमंतीकडे बघुन बछेंद्रीपालला रडु फुटले.
“अरुणिमा, तु तर एव्हरेस्ट शिखर केव्हाच सर केले आहेस, आता फक्त जगाला त्याची तारीख सांगायची आहे.”
अरुणिमा सिन्हा सांगते, प्रवास अजिबात सोपा नव्हता.
तिला बर्फावर उभा राहता यायचे नाही, जखमा ताज्या होत्या, भळाभळा रक्त वहायचं.
पण निश्चय ठाम होता.
“देवा, तु मला जिवंत ठेवलसं, मी काहीतरी भव्य दिव्य करुन दाखवावं म्हणुनच, मला ह्या जगाने गर्वाने बघावं, कीव करणार्या नजरा मला नको आहेत.”
ती सराव करत राहीली आणि आठ महिन्यात तिने धडधाकट लोकांपेक्षा आधी बेसकॅंम्पहुन एव्हरेस्टचा पहिला टप्पा गाठला,
अरुणिमा जिंकली, अरुणिमाच्या चिवट स्वभावापुढे आणि ठाम निश्चयापुढे नियती हरली, गर्भगळीत झाली.
एकेक करत अरुणिमाने एव्हरेस्टचे पाचही टप्पे सर केले. धडधाकट लोकांच्या प्रेतांचा खच पडतो, अशा ठिकाणाहुन ती सहीसलामत वापस आली.
तीव्र इच्छेपुढे, तिने दररोज, क्षणोक्षणी मृत्युला चकवले, आणि २१ मे २०१३, म्हणजे अपघातानंतर दोन वर्षात तिने रात्री दहा वाजुन तीस मिनीटांना एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला…….
ती स्वतः जगेल की नाही, सहीसलामत ती वापस येईल, अशी तिलाही खात्री नव्हती, म्हणुन उणे साठ डिग्री तापमानात, तिने एक व्हिडीओ बनवला. एव्हरेस्ट उतरतानाच सर्वात जास्त मृत्यु होतात. इतक्या वेळ साथ देणार्या दैवाने अजुन एक परिक्षा घेतली.
अचानक प्रोथेस्टिक लेग बाजुला निघाला, काही क्षण ती बसुन राहीली. ऑक्सीजन खुप कमी उरला होता, तिने अंगातले सर्व त्राण बाहेर काढले, घसरत घसरत पुढे निघाली. जे अंतर कापण्यासाठी गिर्यारोहकांना सात तास लागतात ते अंतर वापस येण्यासाठी अरुणिमाला अठ्ठावीस तास लागले. तिच्या जिद्दीपुढे दैवही झुकले.
वर आलेला एक अमेरीकन माणुस खराब वातावरणामुळे वापस फिरला आणि त्याच्याजवळ दोन ऑक्सीजन सिलेंडर होते, ओझं कमी करण्यासाठी त्याने ऑक्सीजन तिथेचं टाकलं आणि अरुणिमाचा जीव वाचला.
बेसकॅंपवर सर्वांनी मानले की अरुणिमा गेली, त्यांच्या लेखी एका पागल मुलीची आत्महत्याच होती ती!
आरुणिमाला जिवंत आलेली पाहुन भलेभले गिर्यारोहक चकित झाले, काही वर्ष त्यांना जे जमलं नाही, ते ह्या मुलीने केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर करुन दाखवलं होतं!
एकेक करत प्रत्येक खंडातलं सर्वात उंच टोक अरुणिमाने पार केलं.
जीव धोक्यात घालुन, हे साहस तिनं का केलं?
तुम्हाला आणि मला, तिने ह्या कृतीनी संदेश दिला की, हिंमत हारु नका, धीर सोडु नका, षंढ बनुन हार मानु नका, पळपुटे बनुन आत्महत्या करु नका. दोन पायांनी अधु असलेली एक मी जगात नाव गाजवयेत? तुम्ही काय करत आहात?
आयुष्याच्या तक्रारी करणं सोडुन द्या! निराशा आणि उदासिनतेला हद्द्पार करा, जीवनाचा उत्सव करा! अरुणिमाने दिलेला संदेश आपल्या हृदयात पोहचावा, ह्या मनःपुर्वक प्रार्थनेसह...
धन्यवाद !...


0 Comments